Tuesday, July 10, 2012

जगाची लोकसंख्या सात अब्ज

9 जुलै 2012 रोजी जगाची लोकसंख्या सात अब्ज, 25 लाख, 71 हजार 966 वर पोहोचली. लोकसंख्या वाढत असली तरी आपण सारे ज्या पृथ्वीतलावर राहतो आहोत, त्या पृथ्वीचे आकारमान पूर्वी होते तेवढेच राहिले. वाढलेली खाणारी तोंडे आणि त्यांच्या वाटय़ाला येणारे धान्याचे प्रमाण यातला फरक दिवसेंदिवस वाढतो आहे. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्या वाढीच्या भस्मासुरावर मात करण्याच्या प्रयत्नांना दिशा मिळावी.

जगाच्या लोकसंख्येने 11 जुलै 1987 रोजी पाच अब्जाचा आकडा पार केला होता. 9 जुलै 2012 रोजी लोकसंख्या सात अब्ज, 25 लाख, 71 हजार 966 वर पोहोचली. लोकसंख्येत होणारी वाढ आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, याबाबत समाजात जागृती करण्याचे काम राष्ट्रसंघाने हाती घेतले आणि 11 जुलै 1989 या दिवसापासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जाऊ लागला. लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांविषयी जनतेला सजग करण्यासाठी राष्ट्रसंघाने विविध कार्यक्रम हाती घेतले, तरीही लोकसंख्या वाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. 1804 मध्ये जगाच्या लोकसंख्येने एक अब्जाचा आकडा पार केला. त्यानंतर लोकसंख्येत एका अब्जाची वाढ होण्यास 1977 साल उजाडावे लागले. म्हणजेच लोकसंख्येत एका अब्जाने वाढ होण्यास 123 वर्ष लागलीत. त्यानंतर मात्र लोकसंख्यावाढीचा वेग वाढतच गेला. नंतरचा एक अब्जाचा आकडा गाठायला म्हणजेच लोकसंख्या तीन अब्ज व्हायला केवळ 37 वर्ष लागली. आता ती सात अब्ज झाली आहे. लोकसंख्या वाढत असली तरी आपण सारे ज्या पृथ्वीतलावर राहतो आहोत, त्या पृथ्वीचे आकारमान पूर्वी होते तेवढेच राहिले. त्यात तसूभरही वाढ झालेली नाही. याचाच अर्थ असा की, 1804 मध्ये एक अब्ज लोकांचा भार पेलणा-या पृथ्वीला सध्या सात अब्ज लोकांचा भार पेलावा लागतो आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार त्या लोकांना राहावयास घर, पिण्यास पाणी, अन्न, वस्त्र या मूलभूत सुविधा मिळवायच्या, यासाठी पुन्हा पृथ्वीचाच आधार घ्यावा लागतो. पूर्वी एक अब्ज लोकांत वाटली गेलेली पृथ्वी आता सात अब्ज लोकांत वाटली जाते आहे. यावरून प्रत्येकाच्या वाटय़ाला पृथ्वीचा किती भाग पूर्वी येत होता आणि आता किती येतो आहे, याचा अंदाज बांधायला हरकत नाही. पृथ्वीवरच शेती करून आपण अन्नधान्य मिळवतो. त्यातही घरे बांधण्यासाठीही बहुतांश जागेचा वापर केला जात असल्याने धान्य पिकवण्यासाठी उपलब्ध होणा-या जमिनीतही घट झाली आहे. तोच प्रकार पाण्याच्या बाबतीतही आहे. पाण्याचे स्त्रोतही आटत चालले आहेत. भूगर्भातली पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. हवेतही प्रदूषणाची भर पडली असल्याने स्वच्छ आणि ताजी हवा, हे एक स्वप्नच झाले आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा उपयोग करून अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आपण यश मिळवले. हे खरे असले तरी वाढलेली खाणारी तोंडे आणि त्यांच्या वाटय़ाला येणारे धान्याचे प्रमाण यातला फरक दिवसेंदिवस वाढतो आहे. पृथ्वीच्या मातीचा कसही कमी होत असल्याने अन्नधान्याचे हे संकट दिवसेंदिवस अधिकच भयानक होते आहे. भूमी, जल, वायू या सर्वाचा होणारा वारेमाप व्यय असाच होत राहिल्यास आणखी काही वर्षांनी पृथ्वीवर राहायला माणसांना जागा राहणार नाही. त्याला खायला अन्न आणि पिण्याला पाणीही मिळणार नाही. पाण्याच्या टंचाईनेही गेल्या काही वर्षात उग्र रूप धारण केले आहे. यापुढे युद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असे सांगितले जाते आहेच. ती वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जगातल्या 242 देशांपैकी पाच देशांतच निम्मी लोकसंख्या आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 19.18 टक्के लोकसंख्या चीनची तर भारताची 17.33 टक्के आहे. या दोन देशांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 37 टक्क्यांच्या आसपास आहे. चीनने मध्यंतरी एक कुटुंब एक मूल हा कार्यक्रम राबवला. त्यामुळे या देशाची लोकसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात आली, तरी वैद्यकशास्त्राने केलेल्या प्रगतीमुळे वाढलेले आयुर्मान यामुळे लोकसंख्येत झालेली घट दिसत नाही. आणीबाणीच्या काळात आपल्या देशातही लोकसंख्या नियंत्रणात आणायचे प्रयत्न झाले. परंतु त्यात झालेल्या अतिरेकामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमातल्या नियोजनालाही फाटा देण्यात आला आणि तो कार्यक्रम आता कुटुंब कल्याण या नावाने राबवला जातो आहे. त्यात कोणाचे कल्याण साधले जाते, हा संशोधनाचा विषय ठरावा. संतती प्रतिबंधक साधनांच्या वापराबाबत जनतेत जागरूकता निर्माण करावी तसेच ती साधने सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्या वाढीच्या भस्मासुरावर मात करण्याच्या प्रयत्नांना दिशा मिळावी आणि ती नियंत्रणात आणण्याची गती वाढावी ही अपेक्षा वावगी ठरू नये.

No comments:

Post a Comment